नेत्वा धुरी
मुंबई : Vehicle caught fire in SGNP बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी सकाळी वाहनाला आग लागल्याची घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. परंतु अनेक वर्षांपासून मुख्य प्रवेशव्दारापासून ते कान्हेरी गुंफेपर्यंतच्या प्रवासासाठी अनधिकृतरित्या सुरु असलेल्या वाहने कधी बंद करणार, असा संतप्त सवाल वन्यप्रेमींनी उपस्थित केला.
बेकायदा मुख्य प्रवेशद्वार ते कान्हेरी गुंफेपर्यंत प्रवाससेवा Vehicle caught fire in SGNP
उद्यानातील कृष्णगिरी क्षेत्रातील पोलिस चौकीनजीक ही घटना घडली. ही घटना उघडकीस येताच वनाधिका-यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या अधिका-यांना बोलावले. घटनास्थळी गर्दी झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. उद्यानात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणधारकांकडून अनधिकृतरित्या मुख्य प्रवेशद्वार ते कान्हेरी गुंफेपर्यंत अनधिकृतरित्या प्रवाससेवा दिली जाते. शनिवार-रविवारी परदेशी पर्यंटकांकडून बेमालूमपणे पैसे आकारले जात असल्याच्या घटनाही याआधी उघडकीस आल्या आहेत. भरधाव गाडी चालवणे, विदेशी पर्यटकांची लूट अशा असंख्य तक्रारी असतानाही प्रशासनाने या ओम्नी वाहनांच्या मालकांविरोधात कडक कारवाया केल्या नाही, अशी तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली.
दोन आठवड्यांपूर्वी अनधिकृत वाहनचालकांनी सरकारी वाहनाच्या वापराविरोधात आंदोलन केले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. स्थानिक नेते मंडळीच्या आशीर्वादाने या अनधिकृत वाहनांचा व्यवसाय सुरु आहे. अनधिकृत वाहनांच्या मालकांची आणि उद्यानाच्या वनसंरक्षक आणि संचालिका अनिता पाटील यांची बैठकही पार पडली होती. या बैठकीनंतर संचालकांकडून कारवाई होणे अपेक्षित होते. कारवाईत दिरंगाई झाल्याने हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी माहिती घेण्यासाठी उद्यानाच्या वनसंरक्षक व संचालिका अनिता पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणी हात झटकले. ”मी सध्या प्रशासकीय कामानिमित्ताने नवी मुंबईत आहे. तुमच्याकडून मला प्रकरणाची माहिती मिळाली. माजी मुख्यवनसंरक्षक व संचालक जी. मल्लिकारर्जून यांनी सप्टेंबर २०२२ साली उद्यानातील प्रशासकीय कामकाजाचे महत्त्वपूर्ण अधिकारी उत्तर व दक्षिण विभागीय अधिका-यांना दिले आहे. आता वनसंरक्षक व संचालक हे पद नामधारी आहे. प्रत्येक लहान गोष्टीत लक्ष घालता येत नाही. या प्रकरणी माहिती घेतली जाईल.”
कृष्णगिरी परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी या अनधिकृत वाहनांना कोणतीही प्रशासकीय मान्यता नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही या घटनेची दखल घेतली असून, वरिष्ठांना कारवाईकरिता अहवाल सादर करणार आहोत. याप्रकरणी कस्तुरबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले.