मुंबईः राज्यातील भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आता या जमिनींवर बँकाकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यभरातील भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या जमीनींवर तारण कर्ज मिळणार आहे.
राज्याच्या महसुल विभागाने तातडीने यासंबंधीत परिपत्रक जारी केले असून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय कोणत्याही एका बँकेपुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणे सोपे होणार आहे.
यापूर्वी 1990 मध्ये भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनींबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनाही पीककर्ज, शेती विकासासाठी मध्यम, दीर्घ मुदतीचे कर्ज देता येणार आहे. कर्जासाठी शासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही.
बँकांना कर्ज देण्याची होती अशी अडचण
शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज परतफेड करु शकला नाही. तर बँक अडचणीत येते. अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगावटा वर्ग दोन असेल तरी त्यावर बोजा चढविता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते. त्यामुळे भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते.
जिल्हा,विभागीय अधिकाऱ्यांना स्मरणपत्र
जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
भोगवटा वर्ग दोनच्या जमिनी म्हणजे काय?
ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग दोन आहे. देवस्थानासाठी दिलेल्या इमानी जमीनी, हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. अशा जमीनी विक्रीसाठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.