ठाणे : (Mumbra Rape) दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून नराधमाने तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणारा नराधम आसिफ मन्सुरी याला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच बेदम चोप दिला.
असे आहे प्रकरण (Mumbra Rape)
मुंब्र्याच्या ठाकूरपाडा येथील श्रद्धा प्राप्ती अपार्टमेंट परिसरात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलीला नराधम आसिफ मन्सुरी याने खेळणी देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत असलेल्या आसिफने या चिमुकलीवर जबरदस्ती अत्याचार केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिले होते.
https://x.com/maha_lakshvedhi/status/1912464602660561013?s=46
मर्जियाच्या हिमतीचे सर्वत्र कौतुक
या प्रकरणी मन्सूर याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपली असल्याने पोलिसांनी त्याला कोर्टात आणले. त्यावेळेस आधीच कोर्टात उपस्थित असलेल्या मर्जिया पठाण यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मन्सूर यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, या प्रसंगी कोर्टात असलेल्या अनेक महिलांनी मर्जिया या या कृतीचे कौतूक करीत नराधमाला केलेल्या मारहाणीचे उघडपणे समर्थन केले.
मर्जिया पठाण यांनी सांगितले की, मयत चिमुरडीची जात – धर्म शोधून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, माझ्या मते ती एक मुलगी होती, माझी छोटी बहिण होती. एवढेच महत्वाचे आहे. अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल, असे काम आपण करायला हवे. त्याच उद्देशाने या नराधमाला मी चोप दिला आहे. आज देशात दररोज शेकडो महिलांवर बलात्कार होत आहेत. हजारो महिलांचे विनयभंग होत आहेत. अशा स्थितीत त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे. ते सरकार वक्फ सारखे विषय आणून धार्मिक विद्वेष पसरवित आहे.
https://www.facebook.com/share/v/1AML8EHLgG/?mibextid=wwXIfr
वास्तविक पाहता, शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली असती तर असे प्रकारच घडले नसते. पण, सरकारला महिलांच्या सुरक्षेपेक्षा मतांसाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यात अधिक स्वारस्य आहे. जर, चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मन्सूरचा खटला जलदगती न्यायालयात चालविला नाही अन् तो जर जामिनावर सुटला तर तो दिसेल तिथे आम्ही पुन्हा प्रसाद देऊ अन् त्याची जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला.