मुंबई : महाराष्ट्र राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. राज्यात 186 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला असून, 843.85 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर 9.46 टक्के उताऱ्यासह 79.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कमी उत्पादन आणि गाळप क्षमता वाढल्याने कारखान्यांनी या हंगामाच्या सुरुवातीलाच कामकाज बंद केल्याचे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर, इथेनॉल उत्पादनाकडे साखर वळणे आणि उत्पादनात घट यामुळे राज्यातील साखरेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत कमी झाले आहे.
राज्यात यंदाच्या गळीत हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते. यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. या साखर कारखान्यांनी 843.85 लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत 798.08 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट केले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.46 टक्के इतका आहे.
राज्यात एकूण 186 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त
पुणे विभागातील 27, अहिल्यानगर विभागातील 24, छत्रपती संभाजीनगर विभागातील 21, नांदेड विभागातील 26 तसेच अमरावती विभागातील 3 कारखान्याचा समावेश आहे. मागील हंगामात याच काळात 207 साखर कारखाने सुरु झाले होते. यात 103 सहकारी तसेच 104 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी 1050.81 लाख टन उसाचे गाळप करून 107.33 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 10.21 टक्के इतका होता.
कोल्हापूर विभागात 202.42 लाख टन उसाचे गाळप
कोल्हापूर विभागातील सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. 40 कारखान्यांनी (14 खाजगी व 26 सहकारी) मिळून 202.42 लाख टन उसाचे गाळप करून 11.09 टक्के साखर उताऱ्यासह 22.44 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.
पुणे विभागात 203.54 लाख टन उसाचे गाळप
पुणे विभागात 31 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात 203.54 लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन 195.31 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.6 टक्के आहे. या विभागातील 27 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
सोलापुर विभागात 130.36 लाख टन उसाचे गाळप
सोलापुर विभागातील सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. 45 साखर कारखान्यांनी (17 सहकारी आणि 28 खाजगी) मिळून एकूण 130.36 लाख टन उसाचे गाळप करून 8.11 टक्के उताऱ्यासह 10.57 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.
अहिल्यानगर विभागात 113.47 लाख टन उसाचे गाळप
अहिल्यानगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खाजगी आहेत. या कारखान्यांनी 113.47 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 100.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.89 टक्के आहे. या विभागातील 24 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात 80.32 लाख टन उसाचे गाळप
छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 13 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 80.32 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 64.3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा उतारा 8.01 टक्के आहे. या विभागातील 21 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
नांदेड विभागात 98.65 लाख टन उसाचे गाळप
नांदेड विभागात 10 सहकारी आणि 19 खाजगी अशा एकूण 29 कारखान्यांनी 98.65 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.66 टक्के साखर उताऱ्यासह 95.3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील 26 साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.
अमरावती विभागात 11.45 लाख टन उसाचे गाळप
अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून त्यात 1 सहकारी आणि 3 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 11.45 लाख टन उसाचे गाळप केले असून, 10.24 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.94 टक्के आहे. या विभागातील 3 साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे.
नागपूर विभागात 3.64 लाख टन उसाचे गाळप
नागपूर विभागात 3 खाजगी कारखाने सुरु असून त्यांनी 3.64 लाख टन उसाचे गाळप करून 1.84 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.05 टक्के इतका आहे.